मुंबई: एसटीच्या प्रवासादरम्यान एसटी बसेसना ठराविक थांबे दिलेले असतात. या थांब्यातील हॉटेलांमध्ये अगदी बेचव आणि महागडे जेवण प्रवाशांच्या माथी मारले जाते. महिला प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठिकाण देखील असते. त्यामुळे अशा सर्व हॉटेल आणि मॉटेलची झडती होणार आहे. आणि प्रवाशांना सकस आणि किफायतशीर जेवण मिळत नसेल, तर अशा थांब्यांची तपासणी करुन ती रद्द करावेत, असे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल - मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा - नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एसटी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे, अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत.
थांबत असलेल्या हॉटेल - मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील, तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.