पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात लाल महालात ३ वर्षे तळ ठोकून राहिलेल्या शाहिस्तेखानाची बोटे मोठ्या हुशारीने छाटली होती. महाराजांच्या या अतुलनीय पराक्रमाची आठवण जपण्यासाठी लाल महालात या प्रसंगाचे ऐतिहासिक शिल्प उभारावे, अशी मागणी लाल महाल स्मारक समितीने पत्रकार परिषदेत केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटून लाल महालात केलेली फजिती याचे स्मारक बनविणे आवश्यक आहे. शाहिस्तेखान पुण्यात तीन वर्षे राहून स्वराज्यातील रयतेला हैराण करीत होता. अवघ्या मुठभर मावळ्यांना समवेत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता शाहिस्तेखानावर आक्रमण केले. यामध्ये शाहिस्तेखानाचा जीव वाचला; मात्र त्याची बोटे छाटली गेली. त्यानंतर घाबरून त्याने तेथून पळ काढला. जागतिक पातळीवरील हा पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’ अशी ओळख असलेल्या या घटनेचे शिल्परूपी स्मारक लाल महालामध्ये व्हावे, जेणेकरून जगभरातून येणार्या पर्यटकांना त्याची माहिती मिळेल, अशी शिवभक्तांची मागणी असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.